ठाणे : भारतीय कम्युनिस्ट प
क्षाच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील संघटनेतर्फे पक्षाचा ९३वा वर्धापनदिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. कुडूस येथून महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या कार्यालयाजवळून काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो जण सहभागी झाले होते.
सीपीआय जिंदाबाद, शेतकरी-कष्टकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांच्या गजरामध्ये ही रॅली निघाली होती. चिंचघरच्या ह. वि. पाटील विद्यालयाच्या पटांगणात या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. चार हजार जण यासाठी उपस्थित होते. ‘एआयएसएफ’च्या कार्यकर्त्यांनी ‘हक्कासाठी न्यायासाठी लढण्यासाठी चला रे’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली.
या वेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. मधुकर पाटील. कॉ. शिवराम पाटील. कॉ. सुनील पाटील. कॉ. चंद्रकांत चौधरी. कॉ. आत्माराम विशे, कॉ. रमेश जाधव, कॉ. विजय कांबळे, कॉ. कल्पेश पाटील, कॉ. कपिल पाटील आदी उपस्थित होते.
‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा नागरिकांना, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सतत लढणारा पक्ष असून, रेशन, पेन्शन, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदेलने करणारा एकमेव पक्ष आहे. कष्टकरी, कामगार यांना न्याय मिळावा यासाठी सतत लढत राहू. कार्यकर्त्यांना मार्क्सवाद शिकवायला लागेल. त्यांचे विचार प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवायला हवेत,’ असे कॉ. मधुकर पाटील यांनी सांगितले. या वेळी कॉ. अॅड. कल्पेश पाटील, प्रा. कॉ. काव्या पाटील, कॉ. तनुजा फाफे, कॉ. रितेश गायकर, कॉ. अक्षय पाटील यांनी चळवळीच्या गाण्यातून प्रबोधन केले.